माहितीचा अधिकार – (RTI)

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तुमचे अधिकार

कामाची मागणी

कामाची मागणी केव्‍हाही करता येऊ शकते. जॉबकार्डवरील क्रमांक नमूद केल्‍यास उत्‍तम.मागणी ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात नोंदविता येते.
काम मागणी नंतर 15 दिवसात काम सुरु झाले पाहिजे.
काम मागणी अर्जानंतर तुम्‍हाला व शिक्‍क्‍यासह पोचपावती मिळाली पाहिजे.
जर 15 दिवसात काम मिळाले नाही तर बेरोजगार भत्‍ता मिळण्‍याचा हक्‍क आहे.

मजुरांचे अधिकार

सर्व मजुरांना मान्‍य नियमानुसार मजुरीचा दर लागू आहे.
स्‍त्री मजूर व पुरूष मजुर यांना समान वेतन लागू आहे.
मजुरी दर आठवडयाला किंवा जास्‍तीत जास्‍त 15 दिवसांनी मिळणे बंधनकारक आहे.
मजुरी वाटप सर्व समक्ष व्‍हावे, मजुरी वाटपाच्‍या वेळी हजेरीपत्रकाचे वाचन करुन जॉबकार्डवर त्‍याची नोंद घेणे गरजेचे आहे.
मजुरी मिळाल्‍यानंतरच हजेरीपत्रकावर स्‍वाक्षरी किंवा अंगठयाची निशानी द्यावी.को-या हजेरीपत्रकावर सही अथवा अंगठा देऊ नये.
घरापासून कामाचे ठिकाण 5 किलोमीटरपेक्षा जास्‍त दूर असेल तर मजुराला प्रवास भत्‍ता देण्‍याची तरतूद आहे. हा प्रवास भत्‍ता मजुरीच्‍या दराच्‍या 10 टक्‍के आहे.

कामाच्‍या ठिकाणी

हजेरीपत्रक कामाच्‍या ठिकाणी उपलब्‍ध असायला हवे. मजुराला कामाच्‍या ठिकाणी हजेरीपत्रक तपासण्‍याची मुभा आहे.
कामच्‍या ठिकाणी विश्रांतीसाठी सावली, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय व प्रथमोपचार पेटी देणे आवश्‍यक आहे.
6 वर्षाखालील 5 पेक्षा जास्‍त मुले असल्‍यास पाळणाघराची सोय होणे आवश्‍यक आहे.

बेरोजगार भत्‍ता

कामाच्‍या मागणीनंतर 15 दिवसात काम सुरु झाले नाही तरी तुम्‍हाला बेरोजगार भत्ता मिळाला पाहिजे.
पहिले 30 दिवस मजुरीच्‍या दराच्‍या 25 टक्‍के आहे व त्‍यानंतर मजुरीच्‍या दराच्‍या 50 टक्‍के आहे. असा बेरोजगार भत्‍ता मिळायला पाहिजे.
बेरोजगार भत्‍त्‍यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज करावा. अर्ज करताना मागणी अर्जाची पोचपावती आवश्‍यक आहे.

जॉब कार्ड

तुम्‍हाला जॉब कार्ड फोटोसहित मोफत मिळायला हवे.
प्रत्‍येक मजुर कुटूंबाला स्‍वतंत्र जॉबकार्ड मिळाले पाहिजे.
जॉबकार्ड कुटूंबाने स्‍वतःजवळ बाळगले पाहिजे.
जॉबकार्डवरील नोंदी तुमच्‍या समक्ष केल्‍या पाहिजेत.
जॉबकार्डवर काही चुकीच्‍या नोंदी होत नाहीत ना याची खातरजमा करुन घ्‍यावी.
जॉबकार्ड हरवल्‍यास नवीन जॉबकार्डसाठी ग्रामपंचायतीत अर्ज करावा.

मदत आणि तक्रार

काही अडचण असल्‍यास ग्रामपंचायतीत संपर्क करावा. तिथे मदत न मिळाल्‍यास आपली तक्रार पंचायत समितीतील कार्यक्रम अधिका-याकडे नोंदवावी
कार्यक्रम अधिकारी यांच्‍याकडे तक्रार केल्‍यास त्‍यांनी 7 दिवसात त्‍यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
त्‍याशिवाय www.nrega.nic.in या वेबसाईटवरही तुमची तक्रार नोंदवू शकता..